कुंकू’ पुसण्याचे धाडस करणार्‍यांचा अंत निश्चित   

मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

दावोस, (गुजरात) : भारताविरुद्ध द्वेष करणे आणि हानी पोहोचवण्याचा मार्ग शोधणे, हेच पाकिस्तानचे एकमेव उद्देश आहे. पण, भारत गरिबी निर्मूलन, आर्थिक प्रगती आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोणी आमच्या बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे धाडस केले, तर त्याचा अंत निश्चित आहे, अशा शब्दांत मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
 
येथील एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. तसेच, ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले. ही केवळ लष्करी कारवाई नसून कोट्यवधी भारतीयांचा तीव्र संताप आहे, असेही ते म्हणाले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २७ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर, ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ६ आणि ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये जैश-ए-महमद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयाचा समावेश आहे.
 
अशा क्रूर हल्ल्यानंतर भारत आणि मोदी शांत कसे बसू शकतात? असा सवाल पंतप्रधानांनी यावेळी केला. त्यावेळी गर्दीतून एकच जल्लोष झाला. जो कोणी आपल्या बहिणींच्या कपाळावरून सिंदूर पुसण्याचे धाडस करेल त्याला नक्कीच संपवले जाईल, असे मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की मोदींविरुद्ध लढणे किती कठीण असेल, असेही ते म्हणाले.
 
२६ मे २०१४ रोजी देशाच्या नागरिकांनी मला ‘प्रधान सेवक’ची जबाबदारी सोपविली. ती नेटाने पार पाडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तिन्ही सशस्त्र दलांना पूर्ण मुभा दिली होती. त्यानुसार, त्यांनी कारवाई केली, असेही मोदी म्हणाले.
 
फाळणीनंतर अस्तित्वात आलेला शेजारील देश केवळ आणि केवळ भारताच्या द्वेषावर जगत आहे. तो नेहमीच भारताचे नुकसान करू इच्छितो. पण, भारताचे ध्येय गरिबी दूर करणे, आर्थिक प्रगती आणि विकसित राष्ट्र असल्याचे ते सांगितले.   
 
’मेड इन इंडिया’ ची झलक संपूर्ण जगाने पाहिली, असेही मोदी म्हणाले. आपल्या देशाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने फक्त स्वदेशी वस्तू आणि उत्पादने खरेदी करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
यावेळी मोदी यांच्या हस्ते २४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. देशभरातील ७० मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत असल्याचेही ते म्हणाले. गुजरातमधील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
 

Related Articles